Menu Close

‘नेपाळ एअरलाईन्स’ या आस्थापनाने जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारत यांना अनुक्रमे पाक अन् चीन यांचा भाग दर्शवला

राष्ट्रप्रेमींनी तीव्र विरोध केल्यानंतर केली क्षमायाचना

अशांना सरकारने धडा शिकवला पाहिजे. परराष्ट्र मंत्रालयाने या घटनेवर नेपाळ सरकारकडे लेखी जाब विचारावा ! – संपादक 

काठमांडू (नेपाळ) – नेपाळमध्ये बालेन शाह यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर भारतविरोधी घटना समोर येत आहेत. ‘नेपाळ एअरलाईन्स’ या नेपाळच्या राष्ट्रीय विमान आस्थापनाने नुकताच एक नकाशा प्रसिद्ध केला. त्यात संपूर्ण जम्मू-काश्मीरला पाकिस्तानात, तर संपूर्ण ईशान्य भारत चीनमध्ये दाखवण्यात आले. जगात स्वत:च्या विमानसेवेचे जाळे किती विस्तारलेले आहे, हे दाखवण्याच्या धडपडीत त्यांनी हे भारतद्वेष्टे कृत्य केले. यास राष्ट्रप्रेमींनी प्रखर विरोध दर्शवला. विरोधाची तीव्रता पाहून शेवटी ‘नेपाळ एअरलाईन्स’ने याविषयी स्पष्टीकरण देत चूक असल्याचे मान्य केले असून क्षमायाचना केली आहे.

२९ एप्रिलला नेपाळचे राष्ट्रीय विमान सेवा आस्थापन असलेल्या ‘नेपाळ एअरलाईन्स’ने त्याच्या अधिकृत ‘एक्स’ खात्यावर जगाचा एक नकाशा प्रसारित केला. त्यात त्याने वरीलप्रमाणे भारतीय प्रदेशाचा मोठा भाग चीन आणि पाकिस्तान यांच्या भूभागात दर्शवला होता. त्याला मोठ्या प्रमाणात विरोध झाला. #NepalAirlines आणि #JammuKashmir असे ‘हॅशटॅग’ वापरून सहस्रो राष्ट्रप्रेमींनी नेपाळवर मोठ्या प्रमाणात टीका केली. त्यांनी या घटनेला ‘भारतविरोधी’, ‘जाणीवपूर्वक केलेली गैरवर्तणूक’ अथवा ‘भारताला चिथावणी’ असे संबोधले.

(म्हणे) ‘ही आमची अथवा नेपाळ सरकारची अधिकृत भूमिका नाही !’ – ‘नेपाळ एअरलाईन्स’चे स्पष्टीकरण

वाढता विरोध पहाता ‘नेपाळ एअरलाईन्स’ने जाहीर क्षमा मागत म्हटले की, आमच्या ‘फ्लाईट नेटवर्क नकाशा’त आढळलेल्या त्रुटीविषयी आम्ही मनापासून दिलगिरी व्यक्त करतो. या नकाशामध्ये आंतरराष्ट्रीय सीमांविषयी गंभीर त्रुटी होत्या आणि या त्रुटी कोणत्याही प्रकारे नेपाळ सरकार किंवा ‘नेपाळ एअरलाईन्स’ यांची अधिकृत भूमिका दर्शवत नाहीत.

जम्मू येथील प्रखर राष्ट्रप्रेमी दिव्या गंडोत्रा टंडन यांनी ‘एक्स’द्वारे व्यक्त केली प्रतिक्रिया !

‘भारताने अनेक दशकांपासून नेपाळच्या अर्थव्यवस्थेला बळ दिले आहे. खुली सीमा राखण्यापासून ते लाखो नेपाळी नागरिकांना रोजगार पुरवण्यापर्यंत; व्यापारासाठी भारताची बंदरे उपलब्ध करून देण्यापासून ते इंधन वाहिन्या (पाइपलाईन्स), ऊर्जा प्रकल्प, आपत्ती निवारण साहाय्य, पायाभूत सुविधांचा विकास, शिष्यवृत्ती आणि सैनिकी सहकार्य उभारण्यापर्यंत – भारताने नेहमीच नेपाळला खंबीर साथ दिली आहे. या पार्श्वभूमीवर ‘नेपाळ एअरलाईन्स’ने प्रसिद्ध केलेला विमान उड्डाण मार्गांचा नकाशा मात्र धक्कादायक ठरला आहे. ही केवळ ‘डिझाईन’मधील चूक असल्याचे वाटत नाही, तर हे एक गंभीर आणि संवेदनशील सूत्र आहे. ज्या वेळी भारत हा नेपाळचा सर्वांत मोठा आणि सर्वांत विश्वासार्ह भागीदार आहे, अशा वेळी एका राष्ट्रीय विमान आस्थापनाकडून झालेला हा निष्काळजीपणा पूर्णपणे अस्वीकारार्ह आहे. हा केवळ एक नकाशा नाही; तर हा एक असा संदेश आहे, जो अनेक प्रश्न निर्माण करतो.’

स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात 

Latest News