बुरहानपूर (मध्यप्रदेश) येथील घटना
मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्याने त्यांनी धर्मांधांचा अशा प्रकारचा कोणताही डाव यशस्वी होऊ देऊ नये, असेच हिंदूंना वाटते ! – संपादक

बुरहानपूर (मध्यप्रदेश) – जिल्ह्यातील एका गावात बाबा नवनाथांच्या समाधीवरून हिंदू आणि मुसलमान यांच्यात हिंसाचार झाला. या वेळी दगडफेक आणि गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी कारवाई करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या घटनेमुळे समाधी हडपण्याचा मुसलमानांचा डाव हिंदूंनी उधळून लावल्याचे म्हटले जात आहे.
हिंदूंचे म्हणणे येथे बाबा नवनाथाची समाधी आहे, तर मुसलमानांचा दावा आहे तो दर्गा (थडग्याच्या ठिकाणी करण्यात आलेले बांधकाम) आहे. येथे हिंदूंनी समाधीच्या परिसराला भगवा रंग दिला. त्याविरोधात मुसलमानांनी पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलीस आणि प्रशासन येथे आले होते. त्यांनी येथे बैठक आयोजित केली होती. तेव्हा झालेल्या वादातून हाणामारी झाली. पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांना प्रथम यश मिळाले नाही. या वेळी दोन्ही बाजूंकडून दगडफेक करण्यात आली. यानंतर पोलिसांनी अतिरिक्त पोलीस मागवून परिस्थिती नियंत्रणात आणली. या हाणामारीत ४ जण घायाळ झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार चालू आहेत. सध्या गावात तणाव असून पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्त्रोत: दैनिक सनातन प्रभात







