हुतात्मा बाल क्रांतीकारक !

‘ऑगस्ट १९४२ मध्ये ‘चले जाव’ चळवळ देशभरात सुरू झाली. या चळवळीला शाळकरी मुलांनीही प्रतिसाद दिला. शाळकरी मुलांपैकी काहींनी चळवळीत सक्रीय सहभाग घेतला, तर काहींनी या काळात क्रांतीकार्य केले. भारतीय क्रांतीकारकांच्या दिव्य हौतात्म्यातून प्रेरणा घेऊन मिसरूडही न फुटलेली अनेक कोवळी मुले पोलिसी गोळीबाराला धैर्याने सामोरी गेली. त्यांचे हौतात्म्य सर्वपक्षीय राज्यकर्ते विशेषतः काँग्रेसी राज्यकर्ते विसरले, तरी आपण ते विसरून चालणार नाही. किंबहुना तसे करणे म्हणजे देशासाठी बलीदान करणार्‍या बाल क्रांतीकारकांविषयी कृतघ्नपणा होईल !

नारायण दाभाडे

हा नववीत शिकणारा विद्यार्थी ९.८.१९४२ या दिवशी पुण्यातील काँग्रेस कार्यालयाजवळ निदर्शकांवर पोलिसांनी केलेल्या बेछूट गोळीबारात जखमी होऊन जागीच ठार झाला.

दत्तू रंगारी

हा बेळगाव जिल्ह्यातील बैल होनगळ या गावचा रहिवासी. इयत्ता सहावीत शिकणारा अवघ्या १३ वर्षांचा मुलगा, २३.८.१९४२ या दिवशी पोलीस गोळीबारात मृत्यू पावला.

भास्कर कर्णिक

भास्कर हा मुंबई विद्यापिठाची विज्ञान शाखेची पदवी उच्च श्रेणीत मिळवलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धीमान तरुण. शिक्षणानंतर पुण्याच्या दारूगोळा अन् स्फोटके यांची निर्मिती करणार्‍या कारखान्यात तो नोकरीला लागला. बेचाळीसच्या चळवळीतील भूमीगत कार्यकर्त्यांनी पुण्याच्या चित्रपटगृहाच्या मालकांना ‘चित्रपट संपल्यावर ‘वंदे मातरम्’ हे गीत वाजवले जावे’, असे कळवले; परंतु या चित्रपटगृहात बहुसंख्य गोरे अधिकारी येत असल्याने त्या मालकांनी ‘वंदे मातरम्’ गीत वाजवण्यास नकार दिला. मग या चित्रपटगृहात बाँबस्फोट घडवून गोर्‍या लोकांना मारण्याचा कट क्रांतीकारकांनी रचला. या कामी स्फोटके पुरवण्याचे काम भास्करने केले. २४.१.१९४३ या दिवशी ‘कॅपिटॉल’ चित्रपटगृहात भूमीगत कार्यकर्त्यांनी केलेल्या बाँबस्फोटात काही गोरे अधिकारी ठार झाले. या कटाच्या संबंधात भास्करला अटक करण्यात आली. ‘आपल्याकडून चळवळीतील भूमीगत कार्यकर्त्यांची नावे छळ करून वदवून घेतील’, या जाणिवेने स्वच्छतागृहात जाऊन सायनाईड हे विषारी द्रव घेऊन त्याने मृत्यूला कवटाळले.

हेमू

हा ‘स्वराज्य सेना’ या संघटनेचा सदस्य. २३.१०.१९४२ या दिवशी सैनिकांनी भरलेली रेल्वेगाडी उडवण्याच्या हेतूने रुळावरील फिशप्लेट्स काढण्याच्या प्रयत्नात असतांनाच हेमूला अटक झाली. हेमूची सैनिकी कोर्टापुढे चौकशी होऊन त्यास फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. अवघ्या १८ वर्षांचा हा तरुण २१.१.१९४३ या दिवशी सक्कर कारागृहात ‘ब्रिटीश साम्राज्य नष्ट होवो’, अशा घोषणा देत फाशी गेला.

काशिनाथ पागधरे

ठाणे जिल्ह्यातील पालघर तालुक्यातील सातपाटी या गावच्या या तरुणाने वयाच्या १४ व्या वर्षापासून स्वातंत्र्यलढ्यात भाग घेण्यास आरंभ केला होता. १९४०च्या एका सत्याग्रहात सहभागी झाल्यामुळे त्याला सहा महिन्यांची सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. ‘चले जाव’ चळवळीत १४.८.१९४२ या दिवशी त्याने पालघरच्या मामलेदार कचेरीवर चार सहस्र जनसमुदाय घेऊन मोर्चा काढला. या मोर्च्यावर झालेल्या गोळीबारात पागधरे जागीच ठार झाला.

शंंकर दादाजी महाले

हा इयत्ता चौथीपर्यंत शिक्षण झालेला १७ वर्षे वयाचा गिरणी कामगार. ९, १० आणि ११.८.१९४२ असे तीन दिवस नागपूरमधील आंदोलकांनी हरताळ पाळून सभा घेतल्या आणि शासकीय कार्यालये अन् पोलीस चौक्या यांवर मोर्चे काढले. या आंदोलकांवर शासनाने केलेल्या गोळीबारात अनेकांना हौतात्म्य प्राप्त झाले. शंकर महालेला एका पोलीस शिपायाच्या हत्येस उत्तरदायी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. १९ जानेवारी १९४३ या दिवशी नागपूरच्या कारागृहात त्याच्यावरील फाशीची कार्यवाही करण्यात आली.’

(झुंज क्रांतीविरांची) (दैनिक सनातन प्रभात, श्रावण कृ. पंचमी, कलियुग वर्ष ५१११ (११.८.२००९))