आध्यात्मिक संज्ञाचा अर्थ (भाग १)

संकलकांचा वैज्ञानिक दृष्टीकोन

या संकेतस्थळावरील कोणतेही लिखाण वाचकाला ‘राज्यघटनेच्या कलम ५१ अ नुसार वैज्ञानिक दृष्टीकोन ठेवण्याला’ बाधा आणण्यासाठी लिहिलेले नाही. राज्यघटनेने कलम २५ नुसार व्यक्तीला धर्मपालनाचा आणि धर्मप्रसाराचा अधिकार दिला आहे. न्यायालयांच्या अनेक निवाड्यांतून स्पष्ट झाले आहे की, धार्मिक भावना वरपांगी कशाही वाटल्या, तरी त्यांत ढवळाढवळ करण्याचा अधिकार शासन अथवा न्यायालय यांना नाही. तसेच ही ढवळाढवळ केवळ सामाजिक शांतता, नैतिकता आणि आरोग्य धोक्यात येत असेल, तरच करता येते. या संकेतस्थळावरील लेख हे या तिन्ही गोष्टींना धोक्यात आणण्यासाठी लिहिलेले नसून घटनात्मक अधिकाराचा वापर करत अध्यात्माचा अभ्यास करण्यासाठी आणि धर्माचरण सांगण्यासाठी देण्यात आलेले आहेत.

श्रद्धेने धर्माचरण केल्यास धर्मासंबंधी विविध अनुभव येतात, हा आजपर्यंतचा इतिहास आहे. धर्म आणि श्रद्धा या गोष्टी वैयक्तिक असल्याने या संकेतस्थळावरील लेखांत दिलेले अनुभवसुद्धा वैयक्तिकच आहेत. त्यामुळे ते सरसकट लागू होतील अथवा सर्वांनाच ते येतील, असे नाही. समाजात अंधश्रद्धा पसरवण्यासाठी किंवा वैद्यकीय उपचारांना किंवा वैज्ञानिक दृष्टीकोनांना विरोध करण्यासाठीही हे लिखाण नाही. वाचकाने डोळसपणे या लेखांचा अभ्यास करणे अपेक्षित आहे, याची कृपया नोंद घ्यावी. – संकलक

संकेतस्थळावरील लेखांत वापरलेल्या काही आध्यात्मिक परिभाषांचे अर्थ

आध्यात्मिक उपाय

एखाद्याच्या मनात पुष्कळ विचार येत असतांना, मन एकाग्र होत नसतांना, मानसिकदृष्ट्या अस्वस्थ किंवा अशांत वाटत असतांना नामजप, ध्यानधारणा, प्राणायाम, मंत्रजप, प्रार्थना इत्यादी आध्यात्मिक कृती केल्यामुळे साधकाचे मन स्थिरावते किंवा प्रसन्न होते. या आध्यात्मिक कृतींना ‘आध्यात्मिक उपाय’ असे म्हणतात.

संकेतस्थळावरील लेखांत टक्केवारीची भाषा

अध्यात्म वैज्ञानिक परिभाषेत कळावे, यासाठी आंतरराष्ट्रीय कीर्तीचे संमोहन उपचारतज्ञ असलेल्या प.पू. डॉ. जयंत आठवले (संकलक) यांनी संकेतस्थळावरील ग्रंथांच्या लेखांत काही गोष्टींतील विविध घटकांचे प्रमाण टक्केवारीच्या भाषेत सांगितले आहे, उदा. थोडे, मध्यम आणि अधिक यांना त्यांच्या प्रमाणानुसार अनुक्रमे १ ते ३० टक्के, ३१ ते ६० टक्के आणि ६१ ते १०० टक्के म्हटले आहे.

साधकांना स्फुरणारे ज्ञान, ही त्यांची अध्यात्मातील प्रतिभा जागृत झाल्याची अनुभूती !

सनातनचे काही साधक अनेक वर्षे साधना (तप) करत असल्याने त्यांची अध्यात्मातील प्रतिभा जागृत होऊन त्यांना विविध विषयांवर ‘ज्ञान’ स्फुरत आहे. ही अनुभूतीच आहे. अनुभूती येण्याच्या संदर्भातील धर्मशास्त्रीय आधार पुढीलप्रमाणे –

ततः प्रातिभश्रावणवेदनादर्शास्वादवार्ता जायन्ते । – पातञ्जलयोगदर्शन, पाद ३, सूत्र ३६

अर्थ : आत्म्याच्या ठिकाणी संयम (योगाभ्यास वा ध्यान) केल्याने प्रतिभासामर्थ्यामुळे सूक्ष्म, व्यवहित (लपलेल्या) किंवा अतिदूर वस्तूंचे ज्ञान होणे (अंतर्दृष्टी प्राप्त होणे), दिव्य (दैवी) नाद ऐकू येणे, दिव्य स्पर्श कळणे, दिव्य रूप दिसणे, दिव्य रसाची गोडी चाखता येणे आणि दिव्य गंध समजणे या सिद्धी प्राप्त होतात.

विश्लेषण : सनातनच्या काही साधकांना श्लोकात वर्णिल्याप्रमाणे एखाद्या विषयाशी संबंधित चिंतन केलेले नसतांना त्याविषयी प्रतिभा जागृत होऊन ज्ञान स्फुरणे, दिव्य नाद ऐकू येणे, सूक्ष्म रूप (सूक्ष्म-चित्र) दिसणे इत्यादी विविध प्रकारच्या अनुभूती येत आहेत.

यावरून साधकांना स्फुरणारे ज्ञान असो कि योगाभ्यासातून साधकांची जागृत होणारी अंतर्दृष्टी असो, या दोहोंना धर्मशास्त्रीय आधार आहे, हे सिद्ध होते.

ज्ञान मिळणार्‍या साधकांचा नम्रपणा !

यासंदर्भात ‘हे ज्ञान माझे नसून हे साक्षात् ईश्वरी ज्ञान आहे’, असा संबंधित साधकांचा भाव असतो. अहंकार वाढू नये, यासाठी ते ज्ञानाच्या लिखाणाच्या शेवटी स्वतःचे नाव न लिहिता स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव लिहितात आणि कंसात स्वतः माध्यम असल्याचे लिहितात, उदा. सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ (सौ. अंजली गाडगीळ यांच्या माध्यमातून). सूक्ष्मजगतातील ‘एक विद्वान’ त्यांना ज्ञान देतात, असा सौ. अंजली गाडगीळ यांचा भाव असतो.

एखाद्या विषयासंबंधी लिहितांना त्रासदायक वाटल्यास ते ज्ञानाच्या शेवटी स्वतःचे नाव घालण्यापेक्षा ‘एक मांत्रिक’ अशा प्रकारे लिहितात आणि कंसात स्वतः माध्यम असल्याचे लिहितात.