मूर्तीपूजेचे महत्त्व

स्वामी विवेकानंद भ्रमंती करत असेच एकदा उत्तरेकडील अलवार संस्थानात गेले. त्यांचे प्रवचन ऐकायला गेलेल्या त्या संस्थानच्या दिवाणाने प्रभावित होऊन त्यांना राजवाड्यावर नेले आणि त्यांची राजा मंगलसिंह यांची भेट घडवून आणली. राजाचे आयुष्य चैनीत चालले होते. शिवाय त्याच्या मनात राजेपणाचा अहंकारही होता. विवेकानंदाना पाहून त्याला वाटले, बोलून चालून हा एक तरुण संन्याशी ! इंग्रजीत प्रवचन करत असला, तरी याचा अनुभव तो किती असणार ? आपण याची फिरकी घ्यावी, असा विचार करून तो म्हणाला, 'स्वामीजी, मूर्तीपूजा म्हणजे शुद्ध अडाणीपणा आहे, असे मी मानतो. एखाद्या मूर्तीला हळदकुंकू आणि फुले वाहतांना तसेच तिच्यापुढे हात जोडतांना लोकांना पाहिले की, मला त्यांची कीव येते. याबाबतीत तुमचे काय मत आहे ?' राजाच्या या प्रश्नाला सरळ उत्तर न देता स्वामी दिवाणजींना म्हणाले, 'दिवाणजी, या भिंतीवर टांगलेल्या चित्रावर थुंकून येता का ?' स्वामींच्या तोंडचे हे वाक्य ऐकून दिवाणजींना कापरेच भरले.

रागाने लालबुंद झालेल्या राजाच्या चेह-याकडे एकवार चोरट्या नजरेने बघून दिवाणजी म्हणाले, ' स्वामी काय बोलता हे ? ते महाराजांचे दिवंगत वडील आहेत !' विवेकानंद म्हणाले, 'दिवाणजी, तो तर काळ्या शाईने रंगवलेला एक जाड कागद आहे'. एवढे बोलून ते राजाला उद्देशून म्हणाले, 'राजेसाहेब, त्या चित्रात अस्थी, मांस आणि जीव असलेले आपले वडील नाहीत; म्हणून त्याला केवळ काळ्या रंगाने रंगवलेला जाड कागद असे म्हणणे जेवढे अविचाराचे आहे, तेवढेच मूर्तीत प्रत्यक्ष देव नसतांना तिला देव मानून तिची पूजा करणार्यांची कीव करणे अविचाराचे आहे.' स्वामी पुढे म्हणाले, 'मूर्ती म्हणजे देव नव्हे, हे त्या मूर्तीची पूजा करणारे ज्ञानी भक्त जाणतात; परंतु निर्गुण, निराकार परमेश्वराची ध्यानधारणा करणे, ही सर्वसामान्यांना जमणारी गोष्ट नसल्याने, त्यांना ईश्वरभक्ती करता यावी, यासाठी मूर्तीपूजा ही प्रारंभीची पायरी आहे. यातूनच पुढे तो परमेश्वराशी एकरूप होण्याचे ध्येय साध्य करू शकतो'. हे ऐकून राजा अंतर्मुख होऊन विचारात पडला.

– (पू.) डॉ. वसंत बाळाजी आठवले (ख्रिस्ताब्द १९९०)