तिन्हीसांजेच्या वेळी हे करावे !

१. ‘शुभं करोति’ म्हणा !

सूर्यास्तानंतर संधीकाल चालू होतो. या काळात प्रबळ होणार्‍या वाईट शक्तींपासून रक्षण होण्यासाठी आचारपालन करावे. त्यासाठी हात-पाय आणि तोंड धुऊन अन् देवापुढे दिवा लावून पुढील श्लोक म्हणावा –

शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसंपदाम् ।
शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तु ते ।।

अर्थ : दीपज्योती शुभ आणि कल्याण करते, त्याचप्रमाणे आरोग्य अन् धनसंपदा देते आणि शत्रूबुद्धीचा, म्हणजे द्वेषाचा नाश करते; म्हणून हे दीपज्योती, तुला नमस्कार असो.

पूर्ण श्लोक https://hindujagruti.org/hinduism-for-kids-marathi/25.html या लिंकवर पाहू शकाल.

२. प्रार्थना करून ‘श्रीरामरक्षास्तोत्र’, ‘मारुतिस्तोत्र’ यांसारखी स्तोत्रे म्हणावीत.

३. मोठ्यांना नमस्कार करून त्यांचा आशीर्वाद घ्यावा.

४. परवचा (वार, तिथी, नक्षत्रे, पाढे आदींची तोंडी उजळणी) म्हणावी.

२. स्तोत्रपठणामुळे होणारे लाभ

१. शक्यतो घरातील सर्वांनी स्तोत्र म्हणण्याच्या निमित्ताने दिवेलागणीच्या वेळी एकदा तरी एकत्र यावे, म्हणजे मुलांवर चांगले संस्कार होतात. कुटुंबातील सर्वांनी प्रार्थनेच्या निमित्ताने एकत्र येणे, लहानांनी मोठ्यांना नमस्कार करणे, एकमेकांची विचारपूस करणे, एखादा सण असेल, तर मुलांना त्याचे महत्त्व सांगणे इत्यादींमुळे घराचे घरपण टिकून रहायला साहाय्य होते.

२. दिवेलागणीनंतर केलेल्या स्तोत्रपठणामुळे मुलांचे पाठांतर चांगले होते. वाणी शुद्ध होते आणि उच्चार स्पष्ट होण्यास साहाय्य होते.

३. स्तोत्रपठणामुळे निर्माण होणार्‍या सात्त्विक स्पंदनांनी घराची शुद्धी होते.

४. स्तोत्राचा अर्थ जाणून घेऊन ते म्हटल्यास, देवतेप्रती श्रद्धा आणि भाव निर्माण होण्यास साहाय्य होते.’

म्हणूनच ‘शुभं करोति’ला उद्या नव्हे, आजच आरंभ करा आणि दूरचित्रवाणीला ‘बाय-बाय’ करा !

संदर्भ : सनातन-निर्मित ग्रंथ, ‘ सुसंस्कार आणि चांगल्या सवयी ‘.

Leave a Comment